Thursday, February 25, 2016

निसर्गस्नेही "वृक्षमित्र वह्या"

१९५० मध्ये आपल्या पृथ्वीतलावर जेवढी जंगले होती, त्याच्या निम्म्याहून कमी आता ती उरली आहेत. वृक्षतोडीमुळे पृथ्वी तापते आहे; जमीन धुपते आहे; पाउस अनियमित होत आहे आणि वाळवंटे विस्तारत आहेत.
वृक्षतोडीचे प्रमुख कारण आहे :  कागद! कागद-निर्मितीसाठी जगभर प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होते. त्या प्रक्रियेतील घातक रसायने खूप प्रदूषणही करतात.
वनांचा, पर्यावरणाचा हा विनाश रोखण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कागदाची बचत करुन आपण हा विनाश कमी तरी करु शकतो.
निसर्गस्नेही वृक्षमित्र वही - नेहमीच्या वहीतील पानाच्या वर उगीचच कोरी जागा असते. ती वाया न घालवता लिहिण्यासाठी वापरल्याने ९६ पानांच्या वहीमध्ये (१०० पानी वही या व्यावहारिक नावाने ओळखली जाणारी वही) एरवीच्या ११३ पानांमध्ये जेवढ्या ओळी असतात तेवढ्या ओळी मिळू शकतात. म्हणजे प्रत्येक वहीमागे १७ पानांची बचत! एका बाजूने ही बचत पैशांची आहे, तर दुस-या बाजूने कागदाची आणि वृक्षांची!
अशाप्रकारे बनविलेली वही शाळेमध्ये वापरण्यासाठी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा समन्वय व एकवाक्यता गरजेची आहे. तसेच अशाप्रकारच्या वह्यांची निर्मिती होणेही आवश्यक आहे. "महाएज्युटेकनेट" टीम यासाठी समन्वयकाची भूमिका पार पाडायला उत्सुक आहे. ही संकल्पना राबवू इच्छिणा-या शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी ९२७२ ७४३ २१२ या मोबाईल क्रमांकावर किंवा cyberedutech@gmail.com या इमेल आयडीवर संपर्क करावा.
निसर्गस्नेही वृक्षमित्र वहीची मूळ संकल्पना श्री. दिलीप कुलकर्णी यांची आहे. 

खादी … प्रतिकात्मक परंतु मनापासून! (सप्टेंबर 16, 2009)

गेल्या सहा महिन्यांमध्ये ६०० पेक्षा अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. आपल्या सामाजिक जीवनाचा एक अतिशय महत्वाचा घटक टाहो फोडून सांगत राहतो की “नाही तुमच्या जगात आम्हाला जगवत”. दहा पंधरा हजाराचं कर्ज माणसाला जीवन संपवायला लावत हे किती भयानक आहे. दहा पंधरा हजार ही  रक्कम याच समाजातल्या‍ कित्येकांच्या  आयुष्यात मौजमजेसाठी सहज खर्च होणारी रक्कम असते.
शेतक-यांसाठी आपण थेट काही करु शकतो असं सुचत नाही … आपण आपल्याच व्यापात असतो. आपलं कुटुंब, आपली कामं. हळहळ व्यक्त करण्यावाचून दुसरं आपण काहीच करु शकत नाही.
पण आपण विचार नक्कीच करु शकतो, आपण शिकलेले आहोत … अमेरिकेची अर्थव्यवस्था का कोसळली हे आपल्याला नेमक ठाउक आहे. पण शेतकरी आत्महत्या का करतात हे कुणी फारस सांगताना दिसत नाही.
आत्महत्या केलेल्या शेतक-यांपैकी बरेच कापूस उत्पादक होते. बाजारात सुती कपड्यांना तर चांगली मागणी आहे. कॉटन किंग, पीटर इंग्लंड, केंब्रीज कितीतरी ब्रॅण्ड. मग शेतक-यांचा कापूस विकला जात नाही असं तर नक्कीच होत नाही. मग काय होत असेल? बाजारात एक शर्ट उत्पादित करायची संपूर्ण किंमत सुमारे ४० रुपये आहे. (संदर्भ अर्धी मुंबई, युनीक फीचर्स). या ४० रुपयात कापूस, त्याचं सूत तयार करणे, कापड विणणे, कापड रंगविणे, ट्रान्सपोर्ट, शिलाई सगळ सगळ येत. आणि बाजारात जेव्हा हाच शर्ट विक्रीला येतो तेव्हा त्याची किंमत किमान २०० रुपये असते. ४० रुपयातले शेतक-याला किती मिळतात आणि कॉटन किंग, पीटर इंग्लंड, केंब्रीज यांना किती मिळतात … विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
चरखा क्रांतीचं साधन आहे … गांधीजी म्हणाले तेव्हा बुध्दिवादी त्याची कुचेष्टा करीत राहिले. आज तेच बुध्दिवादी (पक्षी तुम्ही आम्ही आपण सगळे) कॉटन किंग, पीटर इंग्लंड, केंब्रीजचे कपडे घालतो आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था का कोसळली याची चर्चा करण्यात धन्यता मानतो.
चरखा ही व्हॅल्यू ऍ़डीशन आहे … कापसापेक्षा सूताला अधिक भाव आहे … ती रक्कम थेट शेतक-याच्या खिशात जाणार आहे. खादी शेतक-याला जगवू शकणारी अमृतवेल आहे. हे जाणवत गेल तेव्हा खादी वापरण्यातली मजा कळायला लागली. खादीचा झब्बा आणि लेंगा घालून फिरणं मला अजून जमत नाही पण खादीचा शर्ट आणि जीन्सची पॅन्ट घालण्याइतका माझा धीर चेपला आहे.
आज खादीच कापड महाराष्ट्रातून येत नाही … पण भारतातल्याच कुठल्यातरी राज्यातून – आंध्र, उत्तर प्रदेशातून येतं …  मी शर्टासाठी खर्च करीत असलेल्या २०० रुपयातला बराचसा भाग शेतकरी आणि हातमागधारकाकडे जातो. मी देत असलेली शिलाई माझ्याच गावातल्या शिंप्याला मिळते.
आज ना उद्या विदर्भातला शेतकरी संघटीत होईलच … खादी, हातमाग यांची सहकारी चळवळ उभारीलच.
खादीचे कपडे वापरणं भलेही प्रतिकात्मक असेल पण ते मनाला समाधान देणारे आहे.
मंदार परांजपे
mandarrp@gmail.com

निसर्गायण शिबीराने जीवनशैलीविषयक विचारांना योग्य दिशा दिली (सप्टेंबर 3, 2009)

(2006 सालच्या अखेरीस कुडावळयाला निसर्गायण शिबीराला गेलो होतो.)
कुडावळयाला शिबीराला आलो होतो त्याला जवळजवळ दिड वर्ष होऊन गेले. शिबीरानंतर जगण्यात काय फरक पडला याचा विचार बऱ्याचदा मनातल्या मनात केला आहे. तसे सांगण्यासारखे फार काही मोठे आहे असे नाही, तरीही जे आहे ते सांगतो. प्रथम हे सांगायला हवे की शिबीरामुळे माझया विचार करण्याच्या पध्दतीमध्ये आमुलाग्र बदल झाला. हे हवे, ते हवे अशी वखवख कमी झाली. भौतिक सुखांना अंतीम ध्येय मानणारी विकासाची प्रस्थापित व्याख्या नाकारण्याचे आत्मिक बळ विचारांच्या पातळीवर तरी मिळवू शकलो. दिलीपरावांसारखे जगण्याची हिम्मत आजही माझयात नाही. इच्छा, आकांक्षा आजही आहेत. मात्र मनाची शांती नक्कीच पूर्वीपेक्षा अधिक आहे. एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तर ते मी अधिक शांतपणे स्विकारायला शिबीरातून शिकलो.
व्यावहारिक पातळीवरही छोटे छोटे बदल घडून आले. सर्वप्रथम पिशवीतून घरी येणारे दूध बंद केले. आम्ही 10 वर्षांपूर्वी ज्या दूधवाल्यांकडून दूध घेत होतो, त्यांचे दूध पुन्हा सुरु केले. दूधाच्या बाबतीत आणखी एक प्रयोग केला. शीतकपाटात दूध ठेवणे बंद केले. त्यामुळे दूधातील स्निग्धांश अधिक प्रमाणात दूधातच टिकून राहतो व दूध चवीला अधिक चांगले लागते असे आढळून आले. (शीतकपाटात ठेवलेल्या दूधाची साय जाड होऊन खालचे दूध अतिशय पातळ होत असे.) यात दूध अधिक वेळा उकळायला लागते, मात्र दूध कायम कक्ष तापमानालाच असल्याने ते बरेच लवकर उकळते.
दूसरा बदल म्हणजे कपडे धुण्याच्या यंत्राचा रोज होणारा वापर बंद केला. अंघोळीनंतर स्वत:चे कपडे स्वत:च धुण्याची सवय घरातील सर्वांनीच लाऊन घेतली. याला केवळ 10 मिनीटे अधिक लागतात. मात्र यामुळे कपडे अधिक स्वच्छ राहतात, तसेच अधिक टिकतात असे आढळून आले.
दिलीपरावांनीच गेल्या अंकात म्हटल्याप्रमाणे ‘उटणे वापरणे’ ही पर्यावरणस्नेही जीवनातील सर्वाधिक सोपी गोष्ट असल्याने ती लगेच अंगीकारली. उटण वापरणे ही ‘आपण पर्यावरणस्नेही असल्याचा’ फील गुड जागवते हे खरेच. मात्र त्याचा फायदा होतो हे ही तेव्हढेच खरे. उटणे साबण व दुर्गंधीनाशक असा दुहेरी परिणाम करते. त्वचेचे आरोग्यही अधिक चांगले राहिल्याचे आपले आपल्याला जाणवते.
दिवे, पंखे यांचा वापर आवश्यक तेव्हढाच करणे, कागद जपून वापरणे, थंड पाण्यासाठी माठाचा वापर करणे अशा अनेक लहान लहान गोष्टी आपोआप हातून घडायला लागल्या. एप्रिल 2008 च्या अंकात उल्लेखलेले 4 ही संकल्प आमच्याकडून पाळले जातात. स्वयंचलित दुचाकी वाहन घेण्याचे आधीपासूनच जाणीवपूर्वक टाळले होते.
या गोष्टी ‘दर्या मे खसखस’ आहेत याची मला जाणीव आहे. केलेल्या गोष्टींपेक्षा न केलेल्या गोष्टींची यादी फार मोठी आहे. मात्र पर्यावरणस्नेहाचे बीज मनात रुजले की गोष्टी आपोआप घडतात असे लक्षात आले. आपोआप घडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी बाहेरील ऊर्जा लागत नसल्याने त्या कायम होत रहातात. जीवनशैलीविषयक विचारांना योग्य दिशा देण्याचे काम शिबीराने केले एवढे मात्र नक्की.
मंदार परांजपे
mandarrp@gmail.com

पर्यावरण जगणाऱ्या माणसाची गोष्ट

(हा लेख २००५ मध्ये लिहिलेला आहे.)
लहानपणी जर कधी वैदिक गणित शिकण्याच्या वाटेला कुणी गेला असेल तर त्याने ‘दिलीप कुलकर्णी’ हे नाव नक्की ऐकले असेल. वैदिक गणित या विषयावरच्या अतिशय लोकप्रिय अशा चार छोटयाछोटया पुस्तिकांचे हे सहलेखक. यातील चौथे पुस्तक वैशिष्टयपूर्ण अशासाठी आहे, की, याचे पूर्ण पेजसेटिंग हे हाती केलेले आहे. हस्तलिखीत असावे तसे. असे काहीतरी वेगळे करायचे ही कुलकर्णी यांची खासीयतच आहे. मेकॅनिकल इंजिनिअरींगमधील डिप्लोमा पूर्ण केल्यावर टेल्को कंपनीतील नोकरी म्हणजे काही वर्षांपूर्वीची अतिशय आदर्श अशी परिस्थिती. आत्ताच्या आयटीमधील लोकांइतके नसले तरी बऱ्यापैकी ऐषोआरामी जीवन जगण्याची ही हमीच. परंतु कुलकर्णी यांचे मन त्यात रमले नाही. स्वत:चा शोध घेण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देईना, तेव्हा, टेल्कोतील नोकरी सोडून ते ‘विवेकानंद केंद्राचे’ पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. ‘विवेक-विचार’ या केंद्राच्या नियतकालिकाचे संपादन त्यांनी ८-९ वर्षे केले. मग तेही अपुरे वाटू लागले. माणसाच्या जगण्याचा मूलभूत पातळीवर विचार करताना शहरातील जीवनही त्यांना नकोसे झाले आणि १९९३ साली वयाच्या ३५ व्या वर्षी ते कोकणात दाखल झाले. तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांची डॉक्टर पत्नी व 3 वर्षांचा मुलगा अमेय होता. दापोली-दाभोळ रस्त्यावर पंचनदी नावाच्या गावात दहा जणांनी मिळून काही जागा घेऊन घरे बांधली होती. पर्यावरणविषयक काही विशिष्ट संकल्पना मनात घेऊन हे लोक एकत्र आले होते. त्या प्रकल्पाचे निवासी व्यवस्थापक म्हणून हे कुटुंब पंचनदीस येऊन दाखल झाले. तो प्रकल्प पाहिजे तसा चालला नाही तेव्हा १९९६ साली कुलकर्णी त्यातून बाहेर पडले आणि कुडावळे या गावी घर बांधून रहायला लागले.

वर म्हटल्याप्रमाणे वैदिक गणिताची पुस्तके ही दिलीप कुलकर्णी यांची सर्वतोदूर पसरलेली ओळख. त्याद्वारेच हे नाव प्रथम ऐकले. नंतर त्यांची निसर्गायण, सम्यक विकासाच्या दिशेने, हसरे पर्यावरण, दैनंदिन पर्यावरण यासारखी विविध पुस्तके वाचनात आली. वाचत गेलो तसा या माणसाबद्दल अधिकाधिक जिज्ञासा वाटू लागली. यांना एकदा भेटले पाहिजे असे वाटू लागले. त्यातच नुकताच ‘अंतर्नाद’ मासिकात मिथिला दळवी यांनी लिहिलेला कुलकर्णी कुटुंबाविषयीचा लेख वाचनात आला. त्यानंतर लगेचच दापोली येथे जाण्याचा योग आला, आणि तेथील माझा मित्र श्रीराम महाजन याच्या मदतीमुळे श्री. दिलीप कुलकर्णी यांना भेटण्याचा योगही जुळून आला.
कुडावळे हे गाव, दापोलीपासून १८ किमी अंतरावरील तसे आडरस्त्यावरील गाव आहे. दापोलीपासून दिवसातून दोन तीन एस्टीच्या फेऱ्या या गावात होतात. दापोली-कुडावळे रस्ता चढउतारांचा आणि वळणवळणांचा आहे. निसर्गाचा वरदहस्त लभलेला असा हा प्रदेश आहे. कुडावळे ३००-४०० वस्तीचे गाव असेल. गावापासून अर्धा किमी अंतरावर, डोंगराच्या पायथ्याशी कुलकर्ण्यांचे घर आहे. कुलकर्ण्यांचे घर आपण कल्पनाही करु शकणार नाही एव्हढे साधे आहे. चारही बाजूंनी उतरते छप्पर असणारे, दोन खोल्या व एका ओसरीचे छोटेसे घर. घरात बल्ब आणि एक रेडीओ याखेरीज आधुनिक यंत्रसामग्रीचे नाव नाही. पुस्तकांनी खचाखच भरलेल्या भिंती, अतिशय साध्या दोन कॉटस् आणि घराला शोभतील असेच, दाढीधारी पुराणपुरुष दिलीप कुलकर्णी.
कुलकर्ण्यांच्या घराच्या मागच्या बाजूला प्रचंड पसरलेली देवराई आहे. देवराई म्हणजे देवाला अर्पण केलेली जमीन. त्यातील एखादी ओली फांदीदेखील कुणी तोडत नाही. शेकडो एकर पसरलेली ही देवराई म्हणजे माणसाच्या राक्षसी भुकेपासून वाचलेले पृथ्वीवरील जणू नंदनवनच. त्यातील बऱ्याच भागाला कित्येक वर्षांत माणसाचा पायही लागलेला नाही. निसर्गाला तिथे आपले नियम पाळता येतात. तेथील पर्यावरण माणसाच्या हस्तक्षेपापासून मुक्त आहे. अशा देवराईच्या सान्निध्यातील कुलकर्ण्यांच्या घराला पंख्यांची खरेच गरजच नाही.
दिलीप कुलकर्णी बोलत असतात. विविध विषयांवरची त्यांची जगावेगळी मते सांगत असतात. जिथे माणसाला त्याच्या घराच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचायला लिफ्ट म्हणजे पर्यायाने ऊर्जा लागते त्या माणसांबद्दल, दोन दोन तास कामाच्या जागी पोहोचायला आणि तितकेच परत घरी जायला लागणाऱ्या माणसांबद्दल, ते अनाठायी खर्च करीत असलेल्या ऊर्जेबद्दल, शहरांच्या उभ्या वाढीबद्दल, ही सगळी प्रगती करीत असताना आपण पर्यावरणाचे जे भरुन न येणारे नुकसान करीत आहोत त्याबद्दल. उर्जेचा अधिकाधिक वापर हा प्रगतीचा मानदंड मानणारे विकासाचे रोडमॅप्स चुकीचे आहेत असे ते सांगतात.
एलपीजी गॅस हे चुलीपेक्षा स्वच्छ इंधन आहे अशी आपली सर्वसाधारण समजूत. पण हा गॅस आपल्या घरात येईपर्यंत कोणकोणत्या अवस्थांमधून जातो व त्याच्या वाहतुकीमुळे किती प्रदुषण निर्माण होते याचा विचार करता, अंगणातील झाडाची लाकडे हे कितीतरी चांगले इंधन आहे हे थिअरीमध्येतरी आपल्याला पटते. अशा जगण्यातील लहानलहान गोष्टींतून आपण पर्यावरणावर कसे अमानुष घाव घालीत असतो याची झलक दिलीप कुलकर्ण्यांशी बोलताना ठायीठायी होते.
मी त्यांना माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीविषयी, त्यातून भारतात निर्माण होणाऱ्या सुबत्तेविषयी विचारतो. त्यांच्या मते एवढा पैसा हातात असून उपभोग घ्यायला वेळ नाही अशी माणसांची गत झाली आहे. नुसता पैसा कमवून त्यातून शाश्वत असे काहीच हाती लागणार नाही. मानवी संस्कृतीचा आजचा प्रवास चुकीच्या दिशेने प्रगती करीत चालू आहे असे त्यांना वाटते. इंटरनेटवरील माहितीचा महासागरही त्यांना निरुपयोगी वाटतो. एवढी प्रचंड माहिती मिळवायची तर त्यासाठी किती जन्म घालवावे लागतील असा प्रश्न ते करतात. या माहितीतून अनेक परस्परविरुध्द मते सिध्द करता येतील असे त्यांचे म्हणणे. माणसाला एवढया माहितीची गरजच नसल्याचे ते सांगतात. इमेल आणि इंटरनेटवरील संवाद साधण्याच्या इतर पध्दतीही त्यांना कृत्रीम आणि म्हणूनच खोटया वाटतात. त्यातून माणसामाणसातील संवाद खऱ्या अर्थाने होत नाही असे ते म्हणतात.
दिलीप कुलकर्णी यांची जीवन जगण्याची पध्दत प्रत्येकाला शंभर टक्के पटेल असे नाही. त्यांच्यासारखे जगणे जमणारा तर लाखात एखादा सापडेल. पण तरीही ते म्हणतात त्यात तथ्य आहे असे आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकालाच वाटेल. पर्यायी विकासाची जी वाट ते दाखवित आहेत त्या वाटेवर एखादे तरी पाऊल टाकणे मनात आणले तर प्रत्येकाला निश्चितच जमेल. त्यांच्या घरातून निघताना त्यांना वाकून नमस्कार करावासा मला वाटला. आयुष्यात कधीतरी त्यांच्यासारखं जगण्याची शक्ती लाभावी असे वाटले.
मंदार परांजपे
mandarrp@gmail.com

दिलीप कुलकर्णींविषयी

  • 1978 मध्ये अभियांत्रिकीची पदविका
  • 1978 – 1984 पुण्याला टेल्को कंपनीमध्ये नोकरी
  • 1984 – 1993 विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीचे पुर्ण-वेळ काम. ‘विवेक-विचार’ या नियतकालिकाचे संपादन.
  • 1993 पासून – ‘पर्यावरण’ जगण्यासाठी कोकणातील एका खेडयात सहकुटुंब स्थायिक. विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने, मराठी व इंग्रजीतून स्फुट-लेखन.

दिलीप कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके

  • वैदिक गणित (भाग 1 ते 4) (सहलेखन)
  • निसर्गायण
  • अणुविवेक
  • वेगळया विकासाचे वाटाडे
  • दैनंदिन पर्यावरण
  • सम्यक् विकास
  • Ahead to Nature
  • ‘Sffron’ Thinking – ‘Green’ Living
  • चरित्र – जगदीशचंद्र बसू.

याखेरीज दिलीप कुलकर्णी ‘गतीमान संतुलन’ हे चार पानी मासिक चालवितात. त्याची वार्षिक वर्गणी रु. 30 आहे.